प्रेमाच्या अंधारात

प्रेमाची सुरुवात नेहमी वेद्नेनेच का होते...?

मग ती वेदना सुखद असो वा दुःखद. स्थिर पाण्यावर एखाद्या झुडपाच पान पाडावं अन पाण्यावर तरंग उठावे ... अशीच काहीशी माझी अवस्था होती.

हेरवी शांत असणारं चंचल मन, अस्थिर व्हावं आपण काय करतो आहोत याचे परिणाम काय होतील याची जाणीवही आपल्याला होत नसते.

सुखद प्रेमाचा सहवास माझ्या वाट्याला कधी आलाच नाही. माझ्या आसपास होत्या त्या फक्त वेदनाच. प्रेम समजून मी एक एक वेदना अनुभवत होते. एका एकी मला वेदनेच व्यसन झालं आणि मी त्या वेदनेची रुग्ण झाले. माझी सुरुवात प्रेमातूनच झाली होती, पण त्यानंतरच सारंकाही वाळवंट होतं.

माझ्या सौभाग्याची सुरुवात छळानेच झाली अंगावर कापडं कमी अन् वणच जास्त असायचे दिवसा आड डोळ्यातली विहिर आटत होती. सौभाग्य म्हणून त्याच्या नावाचा कळा धागा गळ्यात बांधला होता त्याची गाठ मात्र घट्टच होती... आपण फक्त वाट पहायची... या आशेवर जगायचं, त्याच्या कळा सोसत त्याची भूक मिटवायची प्रेमाच्या गडध अंधारात जगायचं... इतकचं असत प्रेम !

आजवर मला प्रेमाची इतकीच व्याख्या कळाली होती. गळ्यातला धागा विरळ होत होता मात्र गाठ तशीच घट्ट होती. कालांतराने एक जिवंत खेळन माझ्या पदरात टाकून माझ प्रेम विरळ होऊन गेलं. आता पुन्हा प्रेमात पडायचं, जुनाट जखमा लवकरच भरायला हव्यात, वण लवकरच पुसायला हवेत... पुन्हा कधी विहिर भरून येईल कुणाच ठाऊक...

साहेब





सर्वत्र पसरलेली बातमी ऐकूण मन अगदी बैचेन होत होतं. मनोमन वाटत होतं ती अफवा असावी. वाटत होतं लाख गेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. डोळ्यांसमोर त्यांचा चेहरा खिळून राहिला होता. सहजासहजी विश्वास ठेवणे सोपे जात नव्हते. माझं मन अगदी उन्मळून पडलं होतं. त्या रात्री झोप लागता लागत नव्हती. डोळे मिटले तरी तेच, उघडले तरीही तेच. डोक्यात विचारांनी धुमाकुळ माजवला होता. अधून मधून कानावर समाधानकारक बातम्या येत होत्या. मी काहीसा सुखावत होतो. काही क्षणांसाठी थांबलेलं जनजीवन पुन्हा सुरु झालं. काही वेळाने माझं अशांत मन पुन्हा भवितव्याच्या दिशेने वळू लागलंकाही काळ उलटला असेल स्वत:ला सावरतो न सावरतो पुन्हा एकदा वादळ उठलं आणि अखेर
एका महामानव, महासागर, महाराष्ट्रीय, महायोगी, महापुरुष, मराठी अस्मितेचा तारणहार, युगपुरुष, लढवय्या, साहेब, सेनापती, ढाण्या वाघ, हिंदूंचा वाली, कलाकार, पत्रकार, संपादक, व्यंगचित्रकार, मित्र, एक योध्दा अशा अनेक तळपत्या उपाध्यांनी सन्मानित आदरणीय असलेल्या सुर्याचा अस्त झाला.

बातमी ऐकताच मन अगदी सुन्न झालं. डोळ्यात उभे राहिलेले अश्रू डोळ्यातच ओसरून गेले. निशब्द ओठ, स्तब्ध हृदय, सुन्न मन, चेहरयावर दाटलेली उदासीनता घेऊन मी घरी निघालो. रस्त्याने चालताना वातावरणात पसरलेली गांभीर्यता जाणवत होती. सर्वांच्याच चेहरयावर एक प्रकारच सावट आलं होतं. जो तो आपापल्या विचारात पावलं उचलत होता. कुणाला घरी जायची घाई होती तर कुणी आपल्या दुकानाची आवराआवर करीत होता. त्या दिवसात हिंदू धर्मियांचा सर्वात मोठा दिपोत्सवाचा सण असूनही त्यांच्या चाहत्यांनी आपापल्या दारातील दिवे विझवून टाकले. कित्येक दिवस काहींना फराळही गोड लागत नव्ह्ता. जो तो आपापल्या परीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करीत होता. सर्वत्र एकच विषय पसरला होता … साहेब…  साहेब आणि  फक्त साहेब …

हातगाडी ओढणारा हमाल असो वा मोटारीतून जाणारा मालक असो, कित्येक उद्योजक, उद्योगपती, कलाकार, खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते, नेते मंडळी, कामगार वर्ग, तरुण वर्ग, मित्र मंडळीमध्ये त्यांचा वचक असायचा. अगदी शाळेत जाणारया विद्यार्थ्यांमध्ये विचार बनून, वृद्धांमध्ये त्यांचा आधार बनून, तरुणांमध्ये सळसळत रक्त बनून, उद्योजकांचा वाली बनून, खेळाडूंचा मित्र बनून, कलाकाराची आवड बनून आणि राजकारणाचा एकटा टायगर बनून अविरत वावरत असायचे. भाषेचा, रेषेचा आणि दिशेचा पुरेपूर उपयोग करणारा एक जादुगार.

अगदी तळागाळापासून ते उच्चभ्रू लोकांपर्यंत त्यांना रोखण्याची कुणात टाप नव्हती. तो असे त्यांना उद्देशून बोलण्याची कुणात हिंमत नव्हती. इतरांवर बोट रोखून फक्त त्यांनीच बोलावं आणि आम्ही त्यांच्या मागून अरेss  आवाजss  कुणाचा ….  म्हणावं इतकंचजणू काही आमच्यात भगवं रक्तच सळसळत होतं.

गेली चार दशके ज्यांनी महाराष्ट्रावर राज्य केलं, महाराष्ट्रातल्या जनतेवर असीम प्रेम केलं, मराठी भाषेशी नातं जपलं तोच सोबत सैनिकांचा ताफा घेवून चालणारा वीर आज काळाआड निघून गेला. संपुर्ण महाराष्ट्रभर पसरलेलं भगवं  रक्त आज थेंब थेंब सांडत शिवतीर्थाच्या दिशेने पोहचत होतं. जिवंतपणी विक्रम करता येतात माहित आहे पण त्यांच्या अंत्ययात्रेतूनहि त्यांनी दाखवून दिलं

दुसरया दिवशीच्या वृत्तपत्रांची सर्वच पाने त्यांच्या आठवणींनी भरून गेली. आठवण म्हणून सांगतोत्यातील एका वृत्तपत्रातील कवितेच्या काही ओळी मी वाचल्या

यमलोकी आज   ...  साजरी दिवाळी
पूजेसाठी आमुचा …  चोरला विठ्ठल
रेडयाला भीती   …   कायमची आता ...
यमलोकी सुरु       …   वाघाचा वावर

आता जपण्यासारख्या राहिल्या आहेत तर त्या फक्त त्यांच्या आठवणी आणि त्यांचा इतिहास

-
सुनील संध्या कांबळी. 

निखारे



शब्दांच्या पलीकडे जाऊन बोलण्याचा प्रयत्न मी कित्येकदा केला, पण... माझ्या अनामिक विचारांनी अशी का खेळी केली की मी माझं अस्तित्वच हरवून बसलो. माझ्या जीवनाची अधोरेखित कहाणी मीच लिहिली आणि, आज पुन्हा तिच पाने वाऱ्याने उलटून पुन्हा प्रस्तावनेवर येऊन थांबली आहेत. आज गुरफुटून जाण्यासारखं काहीच नाही पण ज्या प्रश्नांच्या शोधात मी अविरत फिरत होतो आज तिच मला प्रश्ने विचारतायत... तुझी हरवलेली अनामिक नाती कुठेत? तुझी ऋणानुबंध कुठेत? मंद हवेच्या झुळूकीत स्मितहास्य फुलविणारी फुले कुठेत...?

हो आज नि:शब्द राहण्याशिवाय माझ्याजवळ काहीच नाही. माझं आयुष्य आज मनोहर रणपिसे यांच्या ओळीप्रमाणे होऊन बसलंय...

कापराचा देह माझा
विरह अग्नीने जळे...
काळजाच्या आत माझ्या
शुभ्र कमळाचे तळे...

आज पुन्हा वाटतय माझं सर्वस्व मला पुन्हा हवंय... विरलेलं संचित पुन्हा जोडायचयं...

मन माझे,
तुफान वारा...
अश्रु माझे,
पाऊस-धारा...

नेहमी तळपणारा सुर्य आज कुठेतरी विसावतोय... माझं एक पर्व तर कधीच संपलंय, कधी दरवळून जाईन या सृष्टीत माहित नाही...

समजलात तर मी विचार आहे,
मानलात तर मी प्रेम आहे,
अनुभवलीत तर मी साथ आहे,
बरसलो तर मी रुद्र आहे...

अनुभवांच्या निखाऱ्यांवर चालणारा हा रुद्र आज... फक्त अनुभव बनून राहिलाय. आता वेळ आली आहे भावनांना सत्यात उतरविण्याची, पेरलेलं उगवायची... अन् उगवलेलं उपभोगायची...

- सुनिल संध्या कांबळी.

शेवटची भेट

तुला काही आठवत असेल की नाही हे मला माहित नाही पण मला मात्र सारंकाही एखाद्या अपघाताप्रमाणे आयुष्यभर लक्षात राहील! ज्या दिवशी तू पहिल्यांदा माझ्या मैत्रिणीच्या घरी आलीस तेव्हा पासून ते तुझ्या लग्नापर्यंत प्रत्येक क्षणोणक्षण माझ्या लक्षात आहे.. तू फक्त सांग कोणता क्षण!

तुला हे माहित आहे का? एवढया सगळ्या कालावधीत मी तुझ्यासोबत एकूण अठ्ठावीस तास होतो पण हे अठ्ठावीस तास माझ्या जीवनातील पुढील अठ्ठावीस वर्षे हिरावून घेतील हे माहित नव्हतं.

तुला पुन्हा एकदा भेटावयास मनापासून वाटत होतं पण येणं एवढं सोपं नव्हतं. मुंबईच्या धक्काबुक्कीत, कामाच्या गडबडीत विसर पडत होता एवढं मात्र खरं! पण आठवण यायची. न जाणो कसं काय माझ्या दुर्दैवी नशिबाने तुला भेटण्याचा योगायोगा जुळवून आणला. माझ्या मालकाची नवीन कॉन्ट्रॅकटची सुरूवात तुझ्याच गावात व्हावी? काही का असेना तुला भेटण्याची संधी तर मला मिळाली. त्या दिवशी कामामधून वेळ काढून तुला भेटायला आलो. तुझ्या घराकडच्या तुमच्या आळीमध्ये लांबलचक मांडव उभारला होता. लांबून मुलांची धावपळ, बायकांचा गोंधळ, मांडवाला केलेली सजावट, वडिलधाऱ्यांनी मांडलेली बैठक, हे सगळं माझ्यासाठी नविनच होतं. जो तो आपली जबाबदारी दर्शवत होता. माझी नजर तुझ्या घराचा शोध घेतच होती. सगळेजण माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होते. माझ्या पेहरावावरून मी अस्सल मुंबईकर दिसत होतो म्हणून एकाने मला विचारले, कोण हवंय तुम्हांला? मी म्हणालो, ... ... कुठे राहते माहित आहे का? इतक्यात त्यांच्या बरोबर असणाऱ्या चार – पाच मुलांनी तुझ्या घराकडे धाव मारली आणि तुझ्या दारात उभी राहून गोंधळ घालू लागली. ... ताई तुझा मुंबईचा मित्र आलाय. एखाद्या गावंढळ मुलीचा मुंबईशी काही संबंध येत नाही. त्यात मी तुझा मित्र म्हणून मला पहायला दारात तुझ्या मैत्रिणी जमल्या आणि सर्वात शेवटी तू माझ्या समोर येऊन उभी राहिलीस. तुझे ते हळदीमध्ये लिपलेले सौंदर्य पाहून मी पुर्णपणे भारावून गेलो. तुझ्याकडे पाहावं की तुझ्यासोबत बोलावं हेच सुचत नव्हते. नंतर हातातल्या हळकुंडाकडे लक्ष गेलं आणि लक्षात आलं की तो दिवस तुझ्या हळदीचा होता. पहिल्याच भेटीत सगळंकाही हरवून बसल्याने मी माझ्या प्रेमभावनांना मैत्रीचं लेबल लावून टाकलं.

त्या दिवशी तुझा आग्रह होता म्हणून ती रात्र मी तिकडेच थांबलो पण त्या रात्री तू मात्र निर्मळपणाने मला बरेचशे प्रश्न विचारत होतीस. एवढ्याश्या छोटया ओळखीतून तू पवित्र मैत्रीचं नातं जुळवलस. खरं सांगायचं तर तू माझ्यावर दाखवलेला विश्वास, माझ्याबद्दलची प्रेमभावना यामुळे मी पुर्णपणे भारावून गेलो होतो. ज्या प्रेमाची मी वाट पाहत होतो ते हेच पण नंतर आठवण झाली की हे आता थोडया वेळा पुरतंच आहे आणि काही वेळाने मला माझ्या पूर्वस्थितीत जायचं आहे. एक गोष्ट मात्र मी अभ्यासत होतो, तुला माझ्याबद्दल वाटणाऱ्या आपुलकीबाबत बरेचसे प्रश्न तुझ्या नातेवाईकांत उठत होते. असो, पण मला एवढंच वाटत होतं की माझ्यामुळे तुझ्या आनंदकार्यात विघ्न नको. पुढची सकाळ हि माझ्यासाठी काळरात्र ठरणार होती हे मला ठाऊक होतं पण तुझ्या आनंदात मी माझे सर्व दुख विसरून लग्न मांडवात हजर झालो. तुझ्या शुभकार्यात माझाही हातभार लागावा हिच इच्छा उरली होती.

सगळी कार्ये पार पडली आणि अखेरची वेळ होती ती गाठीभेटीची. तुझ्या डोळ्यांमध्ये दाटलेले अश्रुमोती पाहून त्यातील प्रत्येक अश्रु आपल्या ओंजळीत घेवून आपल्या आठवणींच्या बटव्यात जमा करावेत असं वाटत होतं आणि जेव्हा तू माझ्या दिशेने वळलीस तेव्हा मात्र माझ्यात काहीच त्राण उरला नव्हता. संपूर्ण शरीर एखाद्या झाडावरील फुले उन्मळून पडल्यासारखं. मग ठरवलं आणि पुन्हा कोणासोबत जवळीक न करण्याचा निर्धार केला. तीच तुझी आणि माझी शेवटची भेट. 

- सुनिल संध्या कांबळी.